आपला जिल्हा

व्यक्तिनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे संघ -शरदराव हेबाळकर

स्व.जनुभाऊ रानडे व्याख्यानमालेचा सेलूत समारोप

सेलू ( प्रतिनिधी) परकीय सत्ता उलथवून टाकण्यासाठी ,असंघटित हिंदूंना संघटीत करण्याच्या कल्पनेतून सन१९२५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी मोजक्या मित्रांना घरी बोलावून संघाची स्थापना केली. संघ म्हणजे कोणालाही विरोध नसून ,संस्कारक्षम माणूस निर्माण करणे तथा व्यक्तीनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचे प्रतिपादन संघाचे गाढे अभ्यासक डॉ.शरदराव हेबाळकर यांनी केले आहे.

ते येथील स्व.जनुभाऊ रानडे व्याख्यानमालेतील ‘संघ शताब्दी-कार्य आणि जबाबदारी’
या विषयावरील दुसरे पुष्पगुंफताना ,मंगळवार २४ फेब्रुवारी रोजी नूतन विद्यालय सभागृहात बोलत होते.
यावेळी देवगिरी नागरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, विवेकानंद विद्यालय स्थानिक कार्यकारणी अध्यक्ष हरिभाऊ चौधरी ,सचिव उपेंद्र बेलूरकर, देवगिरी बँकेचे शाखा व्यवस्थापक विश्वास देव, आदींची प्रमुख उपस्थिती होती. नूतन विद्यालय येथील रा .ब . गिल्डा सभागृहात भारतीय शिक्षण प्रसारक संस्था व देवगिरी बँक यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत पुढे बोलताना शरदराव हेबाळकर म्हणाली की ,हजारो वर्षांपूर्वी वेदांमधील ऋषीमुनींनी सबंध विश्वातील संबंध मानव जातीसाठी एक घोषणा केली होती .त्यात विश्वातील संपूर्ण जातींना अमृत पुत्र म्हटले होते. आम्हाला स्वतःची जात ,धर्म आणि महत्त्वकांक्षा नाही. आम्ही सर्वजण अशा ऋषीमुनींचे संतान आहोत की ,ज्यांनी जगाला एकच मानले आहे. हजारो वर्षांच्या या तत्त्वज्ञानाशी पूर्वजांशी व संस्कृतीशी आम्ही जोडलेले आहोत. त्यामुळे आम्ही सर्व संघटित असणे गरजेचे आहे .या भावनेतून डॉ. हेडगेवार यांनी एक संघटना स्थापन केली .केवळ हिंदूंना संघटित करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या संघटनेला सहा महिन्यानंतर ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव दिले .२७ सप्टेंबर १९२५ रोजी मोजक्या तरुणांना सोबत घेऊन सुरू करण्यात आलेल्या संघटनेच्या भारतात आज ५ लाख शाखा कार्यरत आहेत .१९२५ ते १९४० या १५ वर्षाच्या कार्यकाळात भारतातील ४० कोटी समाज विविध माध्यमातून विखुरलेला होता. समाजामध्ये एकमेकांविषयी अनास्था होती. दारिद्र्य, विषमता, जातीय मतभेद ,एवढेच नव्हे तर इतिहास देखील समाजाने विसरलेला होता. भारतावर त्यावेळी ब्रिटिशांचे राज्य होते. आणि ब्रिटिशांना हाकलून देण्यासाठी एक चळवळ निर्माण होणे गरजेचे होते .आणि त्याच उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक चळवळ निर्माण झाली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सर्वांचा विरोध झुगारून हिंदूंना संघटित करण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले गेले. भारतात जन्मलेल्या प्रत्येकामध्ये देशभक्ती ही जन्मजात किंवा उपजतच असते. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलांमध्ये देशभक्तीचे बीज असतेच, मात्र त्याला शिंपण करण्याचे काम करावे लागते .ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे .


संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ,कुठल्याही पद्धतीचे मोठमोठे कार्यक्रम घेऊन, प्रसिद्धी मिळवणे हा उद्देश समोर ठेवला नाही .तर संघ घराघरात पोहोचला पाहिजे या उद्देशाने हिंदू समाज हिंदू संस्कृती, हिंदू धर्म यांचे संरक्षण करण्यासाठी संघाचे प्रचारक कार्यरत असतात .सगळ्या समस्यांचे मूळ असंघटित समाजामध्ये असते .संघटन होईपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य असते. संघाच्या शाखेतून मनुष्य निर्मिती करून ,संस्कारक्षम मनुष्यांचा समूह बनवून, तो समूह समस्त हिंदूंचे संघटन करत आहे.अगदी मिलिटरी प्रमाणे बेल्ट ड्रेस व पथसंचलन ही संघाची वैशिष्ट्ये आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कुठल्याही व्यक्तीची पूजा नाही. गुरु म्हणजे भगवा ध्वज ,आम्ही सर्वजण एकमेकांचा हात धरून एका दिशेला जाऊ, हीच राष्ट्रीय प्रार्थना आहे .डॉ. हेडगेवार यांनी पंधरा वर्षात ७०० ठिकाणी शाखा सुरू केल्या होत्या .मात्र आज ८० हजार ठिकाणी संघाच्या शाखा व मनुष्य निर्मितीचे कार्य सुरू आहे. आपण सगळे मातृभूमीचे पुत्र आहोत .ही संघाची संकल्पना आहे .समर्पणाची भावना सगळ्यांच्या मनामध्ये जागवणे हे संघाचे काम आहे. डॉ. हेडगेवार यांना मी पाहिले नाही. मात्र त्यानंतर आलेल्या सर्व सरसंघचालक यांच्यासोबत काम करण्याची संधी मला लाभल्यामुळे ,मी स्वतःला भाग्यवान समजतो .राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रभक्तीचे तत्त्वज्ञान जोडले नसते तर आज देशभरातील सगळी विद्यापीठं जेएनयू सारखी झाली असती .जगभरात जिथे जिथे हिंदू आहेत ,त्यांचे संघटन करून त्यांच्यावर संस्कार करून व्यक्ती निर्मिती द्वारे ,सगळ्या विचारांना गवसणी घालण्याचे काम संघ करत आहे .सबंध हिंदूंच्या संघटनातून राम मंदिराची वास्तू उभी राहू शकली .ही वास्तू उभारण्यासाठी ४० वर्षांचा संघर्षाचा इतिहास आहे .त्यामुळे संघ म्हणजे हिंदू समाज असे शरदराव हेबाळकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

संघ विचारांचा जागर सुरू ठेवा…. किशोर शितोळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली .मात्र मागे वळून पाहताना स्व. जनुभाऊ रानडे यांच्यासारख्या प्रचाराकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, एसटीने प्रवास करून अनेक कुटुंबांना संघाशी जोडले .सगळ्यांशी मनापासून संपर्क करणे हे, प्रचारक मंडळींचे काम असायचे. घरादाराचा त्याग करून प्रचारक मंडळींनी संघाला आयुष्य दिले. बालवयापासून संघात काम करत असताना ,आपण चांगलेच आहोत .हा समाजाचा सकारात्मक दबाव कायम असायचा. चांगलेच वागले पाहिजे ,चांगलेच राहिले पाहिजे, एकमेकांना जोडले गेले पाहिजे, यात खूप सहजता होती .आजही गृहसंपर्क अभियानाद्वारे संघ अविरतपणे काम करत आहे. संघाचा विचार व संघ माहित नाही ,असे एकही घर सापडत नाही .माझा मुलगा संघात गेला पाहिजे असे प्रत्येकाला वाटत आहे .स्व. जनुभाऊ रानडे यांच्या सोबत बालस्वयंसेवक म्हणून काम केले ,हे माझे भाग्य असुन,यापुढे देखील सर्वांनी संघ विचारांचा जागर सुरू ठेवण्याचे आवाहन देवगिरी नागरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी केले आहे.

यावेळी किरण डुघरेकर यांनी देवगिरी बँकेची स्थापना व स्व. जनुभाऊ रानडे व्याख्यानमाला याविषयी मनोगत व्यक्त करून विस्तृत माहिती दिली .
उपेंद्र बेलूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय दिला .गौतम सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले .विजय चौधरी यांनी पद्य व सूत्रसंचालन केले .तर करुणा कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद संकुल व देवगिरी बँक यांचे अधिकारी ,कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!