सेलू ( प्रतिनिधी ) शेतकरी, सैनिक, जिजाऊशिवबा या तीन भूमिकेतून ‘ रानपाखरं ‘ या कविता संग्रहात कविता लिहिलेली आहे. सध्याचा काळ हा भयंकर आहे. आशा या काळाला जिंकण्याचा प्रयत्न करणारा ‘ रानपाखरं ‘ हा कविता संग्रह आहे. असे प्रतिपादन समीक्षक डॉ. कैलास अंभुरे ( औरंगाबाद ) यांनी केले. ते शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान, सेलू, जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात रविवार ( दि. १७ ) सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिना निमित्त आयोजित कवी आत्माराम कुटे यांच्या ‘ रानपाखरं ‘ कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. समीक्षक डॉ. कैलास अंभुरे यांच्या हस्ते आत्माराम कुटे यांच्या ‘रानपाखरं’ या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सर्जेराव लहाने होते. कविता संग्रहाचे भाष्यकार म्हणून दीपक रंगारी ( वर्धा ) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. नितीन लोहाट, ग्रंथमित्र भास्कर पिंपळकर, छबुराव भांडवलकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. कैलास अंभुरे म्हणाले की, ” कवी आत्माराम कुटे हे कवितेशी प्रामाणिक आहेत. ते रानात राबणारे, कुणबी कुळातले कवी आहेत. त्यांच्या ‘ रानपाखरं ‘ या कविता संग्रहातील कवितेत माॅ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मावळे येतात. शेतकरी म्हणून जगताना येणारे अनुभव या कविता संग्रहात आहेत. ‘ कविता संग्रहाचे भाष्यकार दीपक रंगारी आपल्या मनोगतात म्हणाले की, ‘ आत्माराम कुटे हे तुकारामांच्या पठडीतील कवी आहेत. त्यांच्या ‘ रानपाखरं ‘ या कविता संग्रहातील कवितेत शेती, शेतकरी आणि समाजाविषयीचे सुक्ष्म चिंतन प्रकर्षाने जाणवते. ‘ कार्यक्रमात राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश ढवारे, जिल्हा परिषद परभणीचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माणिक पुरी ( मानवत ) मारूती डोईफोडे ( पुर्णा ), शरद ठाकर ( सेलू ) या उपक्रमशील शिक्षिकांचा, तर महाराष्ट्राचा बालकवी पुरस्कार कु. अनया ढाकणे या विद्यार्थीनीला जाहीर झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश हिवाळे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाळू बुधवंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य उत्तरेश्वर शिंदे, मुख्याध्यापक संदीप कऱ्हाळे, लहू घरजाळे, नितीन घुंबरे, शिवाजी बोबडे, जिजाऊ ज्ञानतीर्थच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.