सेलू (प्रतिनिधी ) शालेय मुलांचा अध्ययन स्तर समजून घेत त्यात वाढ करण्याच्या उपाययोजनासाठी वाल्मिकी शिक्षण संस्थेच्या सचिव भावनाताई अनिलराव नखाते यांनी संस्थेअंतर्गत शाळांना भेटी देण्याची मोहीम सुरू केली आहे.
शुक्रवारी शांताबाई नखाते आश्रमशाळा वालूर येथे संस्थासचिव भावनाताई अनिलराव नखाते यांनी भेट दिली.याप्रसंगी विमल नखाते यांची उपस्थिती होती.भेटीदरम्यान भावनाताई नखाते यांनी प्रत्येक वर्गातील मुलांचा सर्व विषयाचा अध्ययनस्तर समजून घेतला.यामध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना तपशील सुचित केला.याशिवाय विद्यार्थांना वाचन,लेखन व गणितीय मुलभूत क्रिया अवगत होणं अनिवार्य आहे असे सांगितले.विद्यार्थ्यांचा कल जाणून त्यापद्धतीने शिक्षण द्यावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी मोठी गुणवत्ता असते. पण पारंपरिक शिक्षणाने ती समोर येत नाही.
त्यामुळे अशी गुणवत्ता शोधून त्यांच्या विकासासाठी बळ पुरविण्यासाठी स्वतंत्र उपक्रम शिक्षकांनी हाती घेऊन त्यांचा वारंवार प्रगती अहवाल संस्थेकडे सादर करावा अशा सुचना दिल्या. निवासी विभागात स्वच्छता, भोजन,शौचालय, पाणी,निवासव्यवस्था,शालेय पोषण आहार या बाबीची तपासणी केली.निवासी मुलींच्या आरोग्यासह सुरक्षितते बाबत चर्चा केली.विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकास होण्यासाठी खेळ,शैक्षणिक सहल,विज्ञान गंमती जमंती,जनरल नाँलेज याचे सुयोग्य नियोजन करून त्याची आंमलबजावणी करण्याच्या सुचना यावेळी नखाते यांनी दिल्या आहेत.याप्रसंगी शाळेतील उपक्रमांची माहीती प्राचार्य रमेश नखाते,मुख्याध्यापक शाम मचाले,लिपीक रेवणअप्पा साळेगावकर यांनी उपलब्ध करून दिली.सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन भावनाताई नखाते यांनी मार्गदर्शन केले.यावेळी भावनाताई नखाते यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.