सेलू प्रतिनिधी आधीच कमी पाऊस त्यात अर्धा अधिक खरीप हंगाम संपत आला असून अशात मराठवाड्यात विविध पंचवीस बोगस कंपन्या खते व औषधी विक्री करत आहेत त्यावर तात्काळ बंदी करण्यात यावी अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आली आहे. यावर्षीचा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या मुळावर आला असून मराठवाड्यात पाऊस देखील अतिशय कमी प्रमाणात पडलेला आहे. अशा या तुटपुंजा पावसात देखील शेतकऱ्यांनी शेतात बी बियाणे लावून पिके घेतली आहेत. थोड्याफार पावसामुळे पिके बोलत आहेत मात्र पिकांना उभारी मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी खते आणि औषधी फवारणी केली आहे. त्यात कृषी विभागाने विविध पंचवीस कंपन्यांची खते बोगस असल्याचा निर्वाळा दिला आहे मात्र जिल्हा तालुका कृषी अधिकारी व जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी कृषी विभाग यांच्या मनमानी भ्रष्ट व बेजबाबदार वर्तनामुळे जिल्ह्यात सर्वत्र सर्वच कंपन्यांच्या खतांची विक्री अथवा वितरण संबंधित दुकानदार किंवा वितरकांनी केले आहे त्यामुळे सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणातील खतांच्या दरामुळे आर्थिक नुकसानही झालेली आहे. यास सर्वस्वी जिल्हा परिषद कृषी विभागातील अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी संबंधित दुकानदाराशी संगणमत करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे यापुढे तरी तात्काळ या बोगस खते असलेल्या यादीतील इतर विक्रीवर ताबडतोब बंदी घालण्यात यावी तसेच दुकानदाराकडे असलेला बोगस खतांचा साठा देखील जप्त करण्यात यावा. आणि ज्या दुकानदारांनी अधिकारी यांच्याशी संगणमत करून शेतकऱ्यांना बोगस खतांची विक्री केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी . तर कंपन्यांच्या खतांची विक्रीची किंमत यामध्ये देखील प्रचंड तफावत आहे त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी बांधव राजरोसपणे लुटला जात आहे त्यावर देखील नियंत्रण असणे गरजेचे आहे. या सर्व बाबीवर तात्काळ कार्यवाही करून त्याबाबतचा निर्णय तात्काळ न झाल्यास 17 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद कृषी विभागासमोर शेतकऱ्यांसह लाक्षणिक उपोषण करण्यात येईल व होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी आपणावर राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले असून निवेदनावर ॲड. श्रीकांत वाईकर, गुलाब पौल, ओम प्रकाश चव्हाल, लिंबाजी कलाल, मुकुंद टेकाळे, रामचंद्र कांबळे, दत्तात्रय कांगणे, रामचंद्र आघाव, चिंतामण दौड, लक्ष्मण प्रधान, इशाक पटेल, नारायण पवार, उद्धव सोळंके, सोनू शेवाळे, दिलीप शेवाळे, उत्तम गवारे, विलास रोडगे, मतीन दादा मिया, परमेश्वर कांदे, दिलीप मगर, ररॉफ भाई ,अशोक कलाल, जलाल भाई, उमेश काष्टे, योगेश सूर्यवंशी, ऍडव्होकेट सुरेश खापरखुंटीकर, मोहन खापरखुंटिकर, केशव दिग्रसकर आदींच्या स्वाक्षऱ्या असून सदर निवेदनाच्या प्रती मुख्य गुण नियंत्रक पुणे, जिल्हा मोहीम अधिकारी कृषी विभाग जिल्हा परिषद परभणी आदींना दिले आहेत.