सेलू ( प्रतिनिधी ) अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात होऊ नयेत म्हणून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सुजाण नागरिक म्हणून अपघात मुक्त देश करणे ही जबाबदारी सगळ्यांची आहे. असे प्रतिपादन सेलू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक बोरसे यांनी केले. ते शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी आणि नूतन विद्यालय यांच्या वतीने आयोजित आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत शनिवार ( दि. २६ ) जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त प्रशालेच्या रा.ब. गिल्डा सभागृहात आपत्ती व्यवस्थापन आणि रस्ता सुरक्षा या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर दहिफळे, भारतीय सैन्य दलातील दिपक खेडेकर, आनंददायी शनिवारचे संयोजक क्रीडा शिक्षक गणेश माळवे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना दिपक बोरसे म्हणाले की, ‘ विद्यार्थ्यांनी अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विनापरवाना मोटार सायकल चालवू नये. आपल्या वडिलांना हेल्मेट घालून गाडी चालवायला सांगावे. आपल्या नियंत्रणात चारचाकी, दोन चाकी वाहन राहिलं इतक्या किमी वेगाने गाडी चालवावी.’ पोलिस उपनिरीक्षक दिगंबर दहिफळे यांनी आपल्या मनोगतात, ‘ वाहतूकीचे नियम सांगितले. आपत्कालीन संपर्क क्रमांक सांगून विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत न भिता त्या परिस्थितीत पोलिसांशी संपर्क साधावा. आपण जागृक नागरिक व्हावे. ‘ असेही ते म्हणाले. या प्रसंगी दिपक खेडेकर यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माळवे यांनी केले. सुत्रसंचलन सांस्कृतिक सहविभाग प्रमुख डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संध्या फुलपगार यांनी केले. आनंददायी शनिवार उपक्रम यशस्वीतेसाठी सुधीर जोशी, संजय भूमकर, अरूण रामपुरकर यांनी पुढाकार घेतला.