सेलू ( प्रतिनिधी ) सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी अभिव्यक्त होणे गरजेचे आहे. पुस्तकांच्या वाचनातून संवाद कौशल्य विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांत पुस्तक वाचनाची आवड निर्माण करा. असे प्रतिपादन साहित्यिक तथा शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील सेवा निवृत्त अधिकारी नामदेव माळी ( सांगली ) यांनी अक्षर व्याख्यानमालेत ‘ भाषा शिक्षण आणि अभिव्यक्ती ‘ या विषयावर बोलताना केले. शहरातील नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब.गिल्डा सभागृहात शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार ( दि. १६ ) रोजी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अक्षर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना नामदेव माळी म्हणाले की, ‘ वाचन संस्कार होण्यासाठी शिक्षकांनी, मुलांनी लिहावे, वाचावे. वाचनामुळे बैठक वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर लिहिते करावे. भाषा भावना व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम आहे. पण भाषा ही केवळ पुस्तकातून शिकायची नसते. भाषा शिकणे म्हणजे आपण जे शिकले आहे त्याचा अर्थ लावणे. ते आकलन होणे, त्यानुसार वागणे असते. मुलांना अभ्यासक्रमासह पुस्तकां बाहेरच शिकवा. त्यांना वर्गा बाहेर पडू द्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश मगर यांनी केले. सुत्रसंचलन संध्या फुलपगार यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक रमेश नखाते यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश हिवाळे, शरद ठाकर, माणिक पुरी, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, सुभाष मोहकरे, व्यंकट तोरणाळे, बाळू बुधवंत, माधव गव्हाणे यांनी पुढाकार घेतला.