सेलू ( प्रतिनिधी )२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी पक्षाने समविचारी पक्षासोबत युती करून भारतीय जनता पार्टीचा विजयाचा महामेरू रोकला व त्यांचे अब की बार चारसो पार चे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही . परंतु महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फूट पाडून महाविकास आघाडी फोडली. त्यासाठी भविष्यात मार्क्सवादी पक्षाची स्वतंत्र ताकद निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे व त्यासाठी या अधिवेशनात कार्यकर्त्यांनी निर्धार करावा असे आवाहन मार्क्सवादी पक्षाचे मराठवाडा समन्वयक कॉ प्रकाश करात यांनी सेलू येथील अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांचे २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च या तीन दिवसीय २४ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचे आयोजन सेलू येथे आयोजित करण्यात आले आहे. येथील साई नाट्यगृहात या अधिवेशनाचा उदघाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला . मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन व हुतात्म्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
येथील महेशनगर मधील साई नाट्यगृहात आयोजित या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्य सचिव डॉ उदय नारकर हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रा यु आर थोबाळ यांची उपस्थिती होती.
उदघाटक म्हणून मराठवाडा समन्वयक कॉ प्रकाश कारत यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे कार्यकारिणीचे सर्व सन्मानीय सदस्य उपस्थित होते.
मराठवाड्यात तीस वर्षानंतर हे अधिवेशन होत आहे. व ते देखील सेलू येथे. कारण सेलूला गोवा मुक्तीसंग्राम मधील हुतात्म्यांच्या गौरवशाली इतिहास आहे. असे विचार प्रास्ताविकात उद्धव पौळ यांनी मांडले. प्रस्थापित राज्यकर्त्यांचे सततचे दुर्लक्ष झाल्यामुळे या भागातील विकासाचा अनुशेष अजूनही बाकी आहे. त्यासाठी या अधिवेशनातून विकासात्मक ठोस निर्णय व्हावेत असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष प्रा यु आर थोबाल यांनी व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलतांना कॉ प्रकाश करात पुढे म्हणाले की, आज चंद्रशेखर आझाद यांचा शहीद दिन तर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे व मार्क्सवादी पक्षाचे २४ वे राज्य अधिवेशन होत आहे
पक्षाचे नेते कॉ सीताराम येचुरी यांच्या जाण्यामुळे पक्षात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यानंतर देखील सर्वजण एकदिलाने काम करून पक्षाची ध्येय धोरणे सांभाळीत आहेत. सध्या सासम्राज्यवाद
मोठ्या प्रमाणात उफाळला असून अमेरिकेत ट्रम्प सत्तेवर आल्यापासून तर जास्त वाढला आहे. त्यांच्या आशीर्वादानेच गाझा मध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार झालेला आहे. अमेरिकेतून हातकड्या घालून भारतीयांची हकालपट्टी होत आहे. तरी देखील मोदी त्यांना मित्र मानतात. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. व यामधून भारतीयांचा स्वाभिमान दुखावला जात आहे.
देशात भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा घाट घातलेला आहे. संविधानाने दिलेले अधिकार समाप्त करून मजुरांच्या अधिकारावर देखील सत्तेच्या बळावर कमजोर केले जात आहे.
तरी याबाबत संघर्ष करण्यासाठी मार्क्सवादी पक्षाला उठाव करणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाला समोर ठेऊन आर एस एस या कारवाया करीत आहे असेही यावेळी करात यांनी स्पष्ट केले. या अधिवेशनात घेण्यात येणारे ठराव पक्षाला दिशा देण्याचे काम करतील असा विश्वास करात यांनी यावेळी व्यक्त केला.
मनुवादी विचारसरणी व हिंदुवादी राजकारण करणाऱ्या भा ज प व आर एस एस ला संपवण्याची जबाबदारी मार्क्सवादी पक्षावर आहे. व त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन देखील यावेळी करात यांनी उपस्थितांना केले.
तीन दिवसीय या अधिवेशनासाठी राज्यभरातून मार्क्सवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. स्वागत समितीचे कार्याध्यक्ष कॉ रामकृष्ण शेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.