परभणी ( प्रतिनिधी ) परभणी जिल्हा सकल ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषण मैदानावर शनिवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने नेमलेली शिंदे समिती रद्द केली पाहिजे. सगेसोयरे अध्यादेश लागु करण्यात येऊ नये. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. मागील दाराने वाटलेले बोगस (अनाधिकृत) कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले पाहिजेत. मागील एका वर्षात कुणबी प्रमाणपत्रावर झालेली नोकरभरती रद्द करण्यात यावी. परभणी पोलीस चालक भरतीस
पात्र असणार्या उमेदवारांचे कुणबी दाखले तथा व्हॅलिडीटी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तात्काळ बांधण्यात यावे. महाज्योती संस्थेस तात्काळ बार्टी, सारथीच्या धर्तीवर निधी देण्यात यावा. पीएचडीधारक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप लागू करण्यात यावी. ओबीसी आंदोलकांवरील मागील दोन वर्षात झालेले आंदोलनातील गुन्हे रद्द करण्यात यावे या मागण्या निवेदनात करण्यात आले आहेत. निवेदनावर अनिल गोरे, कृष्णा कटारे, नागेश तळेकर, प्रा. विठ्ठल तळेकर, सुमित जाधव, बंडू म्हेत्रे, अंगद सोगे, अजय तळेकर, आर.एस. काळे आदींच्या सह्या आहेत.