सेलू (प्रतिनिधी ) जैन धर्म हा विश्वातील सर्वात प्राचीन धर्म आहे. अयोध्या ही तीर्थंकरांची शाश्वत जन्मभूमी तर शिखरजी ही मोक्षभूमी आहेअसे निरूपण अनंतकुमार विश्वभर यांनी दिगंबर जैन कासार समाज संस्था भारत पर्युषण पर्व 13 सप्टेंबर रोजी सेलू येथील जैन मंदिरात आयोजित पुष्प सहावे- उत्तम संयम प्रसंगी व्याख्यानमालेत केले.
पुढे बोलतांना जैन धर्मचा मुख्य गाभा म्हणजेच उत्तम संयम. उत्तम संयम वगळला तर जैन धर्म असूच शकत नाही. संयमाशिवाय तर धर्म प्रारंभ होत नाही. जशी गाडीला गती पाहिजे तसे ब्रेकपण अत्यावश्यक आहे. म्हणजे आयुष्यात वावरताना उत्तम संयम हे ब्रेकचे काम करते. राष्ट्राचे निर्माण आणि राष्ट्राचा विकास संयम धारी पुरुषांमुळे झालेला आहे. संयम धारण केल्यामुळे देशाचे भविष्य विद्यार्थी आपल्या ध्येयाला प्राप्त करू शकतात. दहा व्रताचे अनुयायी स्वत:बरोबर समाजाचे, राष्ट्राचे कल्याण करण्याचे कार्य करीत असतात. पंचमहाव्रताचे संयमासह पालन केले तरच मोक्ष मिळू शकतो. उपवासामुळे संयम प्राप्त होतो, त्याग केल्याने संयम प्राप्त होतो. ईश्वरी तत्त्वाचा विचार केल्याने संयम येतो. हा संयम समग्यज्ञानदर्शन मार्गाचे पोषण करतो आणि संयम हाच निश्चितपणे मोक्षाचा मार्ग आहे.संयम धारण केल्यामुळेच नैतिक मूल्यांची रुजवन होते व नैतिक मूल्य जोपासले जातात आणि या नैतिक मूल्यांमुळेच एक सुदृढ व सदाचारी राष्ट्राची निर्मिती होते. संयमाशिवाय हा सगळा मनुष्य शून्यतेसारखा आहे, असे त्यांनी उदाहरणासह सांगितले. मुनीराजाच्या सान्निध्यात राहून आपणाला जीवनाचे कल्याण करण्याचे भाग्य मिळते. त्यामुळे जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपण चार्तुमास व विहारामध्ये सहवासाचा लाभ घ्यावा, असेही शेवटी अनंतकुमार विश्वंभर यांनी आवाहन केले.
मुंबई येथील जैन कासार मंडळाच्या डोंबिवलीच्या जैन कासार मंडळाच्या कार्यकर्त्या सौ.दीपाली महिंद्रे यांनी पाहुण्यांचा परिचय व सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव अजित मोहिरे (साडवली, रत्नागिरी) यांनी केले.