आपला जिल्हा

श्री शिवाजी महाविद्यालयात बी. रघुनाथ स्मृतिदिनानिमित्त कवी संमेलन संपन्न

परभणी दि. ९ : थोर साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणी व श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील कवींचे कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी मोहन कुलकर्णी होते. तर मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणीच्या अध्यक्ष कथा लेखिका सरोज देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणी आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सुरेश हिवाळे यांचा सत्कार करण्यात आला.

कवी संमेलनात साक्षी कदम, निकिता आसेवार, विकास दळवे, शिवाजी मरगीळ, डॉ. केशव खटींग, महेश देशमुख, श्यामसुंदर धोंडगे, आत्माराम जाधव, सय्यद चांद, राही कदम, माधव हैबतकर, सुवर्णा मूळजकर , सोपान डोके, अमोल देशमुख, यशवंत मस्के, मधुरा उमरीकर, मोहन कुलकर्णी, भानुदास धोत्रे, प्रा. प्रल्हाद भोपे, मारुती डोईफोडे, अविनाश कासंडे, बबनराव आव्हाड, रवी कात्नेश्वरकर या कवींनी जगावे कसे, बाल विवाह, शिवबा, बांडगुळ, बाई, मता पुरताच मराठवाडा, चार कविता, वृक्ष, प्रेम, सामाजिक बांधीलकी, पाऊस या विविध विषयावरील कविता सादर करून कविंनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

आत्माराम जाधव यांनी
“काजळासारखा रंग माझा तरी
माय माझी मला तीट लावायची” ही माईचं प्रेम व्यक्त करणाऱ्या या गझलेने, अविनाश कासंडे यांनी
‘कधीकाळी कुण्या कंठातला मी आरसा होतो’ या गझलेने तर सोपान डोके यांनी
“दुःख जेव्हा काळजाला फार होते जेव्हा गझल माझी आधार होते” या गझलेने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. “उसालाही घाम फोडणाऱ्या जिंदगी चिवटी झालेल्या टोळीतल्या बाया
घणाला लयीत फिरवून आगजाल लोखंडाला नीट करणाऱ्या पण डोक्यावर छप्पर नसलेल्या उघड्या जिंदबाज बाया”
स्त्री जीवनाची व्यथा सांगणारी कविता डॉ. केशव खटिंग यांनी सादर केली. “कुणब्याच्या डोईवरी फाटलं आभाळ रं
असा कसा नशिबावर कोसळतो काळ रं” महेश देशमुख यांच्या या कवितेने अवकाळी पावसाने पिकं उध्वस्त झाल्या नंतरची शेतकऱ्यांची वेदना व्यक्त केली. ‘माझी नवी वसाहत’ या कवितेतून मारूती डोईफोडे यांनी शहरीकरणाचे वास्तव चित्र व्यक्त केले. प्रास्ताविक सरोज देशपांडे यांनी केले. कवी संमेलनाचे सुत्रसंचलन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. भगवान काळे यांनी केले. कवी संमेलनात गझलकार सतीश दराडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कवी संमेलनास मोठ्या संख्येने शहरातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी,श्रोते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!