आपला जिल्हा
शेतीकडे सकारात्मक दृष्टिने बघा – कांतराव झरीकर
सेलू 🙁 प्रतिनिधी ) एका दाण्याचे हजार दाणे करण्याचे सामर्थ्य शेतकऱ्यात आहे. सुक्ष्म नियोजन करून शेती करा. कारण शेती सारखा दुसरा उद्योग नाही. शेतीकडे सकारात्मक दृष्टिने बघा. म्हणजे नक्कीच शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. असे प्रतिपादन कृषीभूषण कांतराव झरीकर यांनी केले. ते तालुक्यातील मालेटाकळी येथील गोपिका गोविंद ताठे या सनदी लेखापाल ( सी.ए.) झाल्या बद्दल गावकऱ्यांच्या वतीने शुक्रवार ( दि.१६ ) रोजी आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर ताठे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, रामराव बोबडे, गोपिकाचे पालक गोविंद ताठे,जयश्री ताठे यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना कांतराव झरीकर म्हणाले की ” निवडणूकीपुरत राजकारण ठिक आहे. पण निवडणुकी नंतर गावात कायम एकोपा असायला हवा.गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. ” शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आपल्या भाषणात म्हणाले की, ” शिक्षणातूनच उन्नतीचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे शिक्षण घेऊन गोपिका सारखे यशस्वी विद्यार्थी गावागावात घडल्या पाहिजेत. पालकांनी अवास्तव अपेक्षांचे ओझे आपल्या पाल्यांवर न लादता. आपल्या पाल्याचा जिकडे कल आहे. त्याला प्रोत्साहन द्यावे. तरच खऱ्या अर्थाने मुलं मोठी होतील.” गावकऱ्यांच्या वतीने सनदी लेखापाल (सी.ए. ) झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गोपिका ताठे यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या वतीने अशोक खरात यांनी तर पी.सी.बी.सायन्स अकॅमीच्या वतीने किरण खरात,किरण जाधव, प्रशांत देशमुख,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने उमाकांत गवळी,विष्णू काळे यांनी गोपीका ताठे यांचा सत्कार केला.धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भगिरथ महाराज ताठे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रामराव गायकवाड यांनी केले. सुत्रसंचलन सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. विलास खरात यांनी केले. कार्यक्रमात यशस्वीतेसाठी डॉ.शरद ठाकर,चैतन्य खरात, अशोक ताठे,सुभाष झगडे,पवन ताठे, अविनाश ताठे यांनी पुढाकार घेतला.
गावकऱ्यांना पेढे वाटून आनंद साजरा करण्या ऐवजी पर्यावरण प्रेमी सी.ए.गोपिकाचे वडील गोविंद ताठे यांनी ५०० केशर आंब्याच्या झाडांचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते केले.फळ झाडांचे संवर्धन गावकरी करतील व त्यानिमित्ताने पर्यावरण संवर्धनास नक्कीच हातभार लागेल