आपला जिल्हा

पत्रकाराचे प्रश्न सोडवणार्‍या सरकारच्या विरोधात लढा ! —एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन :

सेलू ता. २ (प्रतिनिधी ) : ‘मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाही. जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील, अशा सरकारच्या सोबत आम्ही. मात्र जे सरकार आमचे प्रश्न सोडवणार नाही, आम्ही त्यांच्या विरोधात लढणार. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आम्ही लढा सुरूच ठेऊ’ असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले.

मराठी पत्रकार परिषदेच्या वत्तिने देण्यात येणारा रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार राज्य मेळावा शनिवार (ता. १) सेलू शहरातील साई नाट्य गृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे होते. तर उद्घाटक अँकर ॲन्ड प्रोड्युसर न्युज १८ लोकमतचे विशाल परदेशी, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद अष्टीकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, मनसुर शेख, संदिप कुलकर्णी, भरत निगडे, महिला आघाडीध्याक्षा शोभा जयपुरकर, अनिल वाघमारे, प्रकाश कांबळे, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, तहसिलदार शिवाजी मगर, माजी उपनगराध्यक्ष हेमंतराव आढळकर, जि. प. बांधकाम सभापती अशोक काकडे, जयप्रकाश बिहाणी, प्रभू दिपके, महम्मद इलियास, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशमुख यांनी पुढे बोलतांना सांगीतले की, सरकार कुठलेही असले तरी पत्रकारांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असाच आहे. सरकारच्या पेन्शन योजनेबाबत नेहमी हे दिसून येते. पत्रकारांना पेन्शन देतांना सरकार वेळोवेळी त्यांच्याकडे बजेट नसल्याचे नेहमीच सांगते. त्यामुळे आता पत्रकाराच्या पेन्शनसाठी सरकारने अर्थसंकल्पातच तरतूद करावी अशी, मागणी आम्ही राज्य शासनाकडे केली. तसेच पत्रकार संरक्षण कायदा झाला. पण तो कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्षात पत्रकार संरक्षण कायदा पाहीजे तसा आमलात आलेला नाही. एकप्रकारे राज्य शासनाने पत्रकाराची केलेली ही फसवणूकच आहे. ‘पत्रकार संरक्षण कायद्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू किंवा न्यायालयात जाऊ’ असे देशमुख यांनी पत्रकार मेळाव्यात मार्गदर्शन केले. तर विशाल परदेशी म्हणाले की, ग्रामीण भागातील पत्रकारांकडे जेवढी माहिती असते, तेवढी शहरी भागातील पत्रकारांना नसते. चांगला फिल्ड रिपोर्टर हा उत्तम अँकर होऊ शकतो. बेधडकपणे व्यक्त होण्यास प्राधान्य द्या. असे बोला जे तुमच्या आईला समजेल, असे प्रश्न विचारा जे तुमच्या आईला समजतील. आयुष्यात आपल्याला जमिनीवर आणणारी माणसे असावीत, तरच माणूस माणसात जाऊन उत्तम मिसळू शकेल. पत्रकारिता क्षेत्रात प्रत्येक क्षण स्पर्धेसारखा असतो, आणि या स्पर्धेत आपण टिकणे गरजेचे आहे. पण आपण कोणतीही बातमी देताना शब्दांचे भान फार महत्त्वाचे आहे. घरातील महिला जेव्हा घर सांभाळते, तेंव्हाच पत्रकारीतेचे व्यसन पूर्ण होऊ शकते. तसेच पत्रकारिता करतांना आरोग्य सध्दा जपणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर ब्रेकिंग न्यूज मिळवण्याच्या नादात नाही ते धाडस करू नका. धाडस कोणत्या गोष्टीचे करावे, हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वतःला जपा, कुटुंबाला जपा. कारण आपले कुटुंब आहे तरच आपण आहोत,’असे परदेशीं यांनी देखील आपल्या मार्गदर्शनात पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास यांनी केले तर सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. रेवणअप्पा यांनी आभार मानले.

यांना पुरस्कार देण्यात आला.

अकोला जिल्हा पत्रकार संघ यांना गौरविण्यात आले तर आदर्श तालुका पत्रकार संघ (कोल्हापूर विभाग), बुटीबोरी तालुका पत्रकार संघ (नागपूर विभाग), सेलू तालुका मराठी पत्रकार संघ (छत्रपती संभाजीनगर विभाग), पिंपरी चिंचवड तालुका पत्रकार संघ (पुणे विभाग), शहादा तालुका पत्रकार संघ (नाशिक विभाग),उमरगा तालुका पत्रकार संघ ( लातूर विभाग), खामगाव प्रेस क्लब (अमरावती विभाग),चिपळूण तालुका पत्रकार संघ (कोकण विभाग) यांना देण्यात आला. तर डी. व्ही. मुळे (ज्येष्ठ पत्रकार), कांचनजी कोरडे (ज्येष्ठ पत्रकार) यांचा देखील गौरव करण्यात आला. सोबतच येथील तरुणी शेख अलिना शेख मुनीर हिची इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये निवड झाल्याबद्दल तिचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेलू तालूका मराठी पत्रकार परिषदेचे व डिजिटल मिडीयाचे सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!