सेलू (प्रतिनिधी) दि 23 मानवी जीवनात परमार्थ हा भाव महत्वाचा आहे.मानवी जीवनात अनेक प्रसंग असतात ज्याला आपण परमार्थ म्हणतो परंतु सुख,समाधान,शांती हे शब्द सांसारिक वापरत असले तरी ते पारमार्थिक शब्द आहेत.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पसायायदानात सकळ मानवाच्या आनंदासाठी मागणे मागितले आहे.आपण वेगळे आहोत हे माणसाने दाखवावं पण वेगळेपणाची व्याप्ती वाढवावी.संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे अलौकिक मागण आहे.म्हणून मानवी जीवनाचा चढता आलेख मांडणे म्हणजे पसायदान आहे असे विचार श्रीक्षेत्र पंढरपूर येथील प्रसिद्ध श्रीगुरु हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांनी मांडले.
येथील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने पसायदान या तीन दिवसीय प्रवचनमालेचे आयोजन आज 23 ते 25 दरम्यान येथील साई मंदिरात सायं. 6.30. ते 8.30 यावेळेत करण्यात आले आहे.यावर्षी याप्रवचनमालेचे 5 वे वर्ष आहे.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,माजी नगराध्यक्ष ऍड.वसंतराव खारकर यांच्या प्रतिमापूजनानंतर सद्गुरू पूजन वसंत प्रतिष्ठानचे महेशराव खारकर व ऍड.उमेशराव खारकर यांनी केले आणि हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.तसेच गुरुमाऊली मुक्ती प्रिया चैतन्य महाराज देगलूरकर यांचे मात्रपूजन वसुधा महेश खारकर,मधुरा महेश खारकर यांनी केले.प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले सर्वप्रथम अभंग घेण्यात आला.गायक सखाराम उमरीकर,तबला शिवाजी पाठक,हार्मोनियम शंतनू पाठक,मृदंग केदार तांबट आदींनी साथ दिली. यावर्षी ” वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भु मंडळी भेटतो या भुता ” या ओळीचे निरूपण करतांना हभप चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले की, अलौकिक होण्यासाठी आधी लौकिक होणे महत्त्वाचे आहे.ज्ञानेश्वरांनी पसायदानात अलौकिक मागणे मागितले आहे.संपूर्ण पसायदानात बहुतांश मागण्या या साधन स्वरूपात आहेत.कष्टानं मिळवलेलं मूल्य कायम राहत.पसायदानात ज्ञानेश्वरांनी पसायदानात साधयाची मागणी न करता साधनांची मागणी केली आहे.विकसित मानवी जीवन विचारांच्या प्रगल्भतेवर ठरत असते.पसायदान जर आपण म्हणत असू तर त्याप्रति आपली काही जबाबदारी आहे हेही मानवाने लक्षात ठेवायला हवे.समाजाच सामाजिक स्वास्थ्य टीकायचं असेल तर त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच उत्तरदायित्व हे देखील तितकंच महत्वाचं आहे.सर्व समाजात पसायदान रुजाव आणि सर्व समाज सुखी व्हावा यासाठी संत ज्ञानेश्वर यांनी पसायदानातून मागणी केली आहे.संत वारंवार भेटत राहिले तर खळाचं खळत्व निघून जात.समाजातील भूतमात्रांना संतांनी अनवरत भेटत राहिले पाहिजे.संत संगती मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवते असेही देगलूरकर महाराजांनी सांगितले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले.