सेलू ( प्रतिनिधी ) शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजन पूर्वक आणि अभ्यास करून शेतीत प्रगती करत उद्योगशील बना असे प्रतिपादन लक्ष्मी नरसिंह कारखान्याचे संचालक प्रमोद जाधव यांनी केले. येथील बळीराजा संघर्ष समितीची स्थापना व शेती आधारित प्रक्रिया उद्योग मेळावा स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती अशोक काकडे हे होते यावेळी विठ्ठलराव गिराम, रमेश डख, रमेश माने, विजय भुजबळ, रामेश्वर गाडेकर, गणेश काष्टे, किशोर जोशी अमृतराव शिंदे आदींची उपस्थिती होती. शेती व्यवसाय प्रगती करण्यासाठी अभ्यास करून तसेच शास्त्रज्ञांची मार्गदर्शन घेऊन नवीन नवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. यातून आपणास प्रगती साध्य करता येते. परंतु,कष्ट करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. राज्याच्या विविध भागात पीक पद्धतीचा अभ्यास करून त्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि मार्गदर्शन घेऊन दुग्ध व्यवसाय देखील शेतीला पूरक आहे. दुग्ध व्यवसायातून दररोज आपल्या हातात पैसा मिळतो. मात्र शोकांतिका अशी आहे की, मराठवाड्यात मागणी असूनही दूध उत्पादन कमी आहे. योग्य नियोजन केल्यास दुग्ध व्यवसायाला भरभराटी मिळू शकते.तसेच शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतो मराठवाड्यात बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दूध विकले जाते. पाण्याचे नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली तर दुधातूनही शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतात. बळीराजा संघर्ष समितीतून आपले प्रश्न सोडून घ्या तसेच शेतीला जोडधंदा देण्यासाठी उद्योग उभारा त्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शनातून चांगली दिशा मिळेल असा विश्वास प्रमोद जाधव यांनी व्यक्त केला. अगोदर आपल्याला काय करायचे आहे हे ठरवा. इतर जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाला भेटी द्या. त्यानुसार आपले नियोजन करा. त्यातून चांगले उत्पन्न आपणास मिळू शकते. कष्टाला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. पाण्याचे काटकसरीने नियोजन करा आणि आत्मविश्वासाने शेतीत प्रयोग करा. अनुभवातून त्यांनी प्रगती केली अशा व्यक्तींच्या भेटी घेऊन वाचन करून देखील शेती त प्रयोग करता येतात. शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घ्या शेतीसाठी वेळ काढा असे कृषी भुषण विठ्ठलराव गिराम यांनी स्पष्ट केले. यावेळी ग्रामीण यांनी स्वतःचे अनुभव शेतकऱ्यांसमोर मांडले. दरम्यान ज्येष्ठ पाच शेतकऱ्यांच्या हस्ते पेंडी बांधून बळीराजा संघर्ष समितीची स्थापना यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्नावर काम करणार असल्याचे अशोक काकडे यांनी सांगितले. प्रास्ताविक अशोक उफाडे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी तर रामेश्वर गाडेकर यांनी आभार मानले.