सेलू ( प्रतिनिधी ) ग्रामीण पत्रकार म्हणजे उपेक्षित वर्ग आहे . त्यासाठी आपण ग्रामीण पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार अशी ग्वाही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुबई चे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी सेलू येथील पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलतांना दिली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न सेलू तालुका मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया यांच्या वतीने आज दि ११ ऑक्टोबर २३ रोजी पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी ३ वाजता आयोजित या कार्यक्रमासाठी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळूखे, अनिल वाघमारे, रवी उबाळे, सुरेश नाईकवाडे व लक्ष्मण बागल यांची व्यासपीठावर उपस्थिती होती .
मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्या नंतर सर्व मान्यवरांचा सेलू पत्रकार संघ व डिजिटल मीडिया पत्रकार संघ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाचे सचिव मोहसीन मामु यांनी प्रास्ताविकात संघाने आतापर्यंत केलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.
यावेळी डिजिटल मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,परिषदेचे बीडचे जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे ,परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर, राज्य निवडणूक निरीक्षक सुरेश नाईकवाडे यांनी मनोगतात परिषदेच्या कार्याची तसेच पत्रकारांच्या संघटन आवश्यकतेची ओळख करून दिली
यावेळी बोलतांना एस एम देशमुख पुढे म्हणाले की , परिषदेच्या अनेक वर्षांच्या लढ्यानंतर सरकार ने सुरू ने केलेली पत्रकार सन्मान योजना ही फसवी आहे . या योजनेतील अनेक पत्रकारांचे अर्ज अजूनही धूळखात पडून आहेत. ही खंत आहे.
पत्रकारासाठी असलेली शासकीय आरोग्य योजना देखील नियमांच्या कचाट्यात अडकून पडली आहे.
त्यामुळे पत्रकारांनी केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने सर्व पत्रकार सदस्यांच्या माध्यमातून पत्रकार निधी उभारावा व त्यातूनच गरजू पत्रकाराला आर्थिक मदत करता येईल. असे देखील त्यांनी आवाहन केले . अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या लढ्यातून पत्रकार संरक्षण कायदा तयार करून घेतला व कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. परंतु त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नाही. अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यासाठी संघटित होऊन उठाव करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. त्यासाठी ग्रामीण पत्रकारांच्या बळावरच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सतत लढत आहे .डिजिटल मीडियाला संघटनेत सोबत घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले तर निसार अहेमद यांनी उपस्थितांचे आभार मानले. परभणी येथून राजकुमार हट्टेकर, लक्ष्मणराव मनोलीकर, दत्तात्रय कहाले, सुधाकर श्रीखंडे, विठ्ठल वडकुते, प्रभू दिपके, माणिक शिंदे, विलास घनसावंत,प्रमोद अँभुरे तसेच पाथरी येथून माणिक घुमरे सेलू पत्रकार परिषदेचे तालुका अद्यक्ष लक्षमण बागल,डिजिटल मीडिया तालुका अद्यक्ष किशोर कटारे, यांच्या सह सेलू तालुक्यातील पत्रकार मित्रांची आवर्जून उपस्थिती होती.